कोरोना – महाराष्ट्रात शुक्रवारी १२० बळी, पुण्यात २७५ तर राज्यात २७३१ नवीन रुग्ण
राज्यात ४२ हजार ६०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
मुंबई, दि.६ : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू असून राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (५७.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३, ठाणे -९, उल्हासनगर -६, नवी मुंबई -६, सातारा- २, वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १असे मृत्यू आहेत.
राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६०३ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ४२२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.८२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.