पुढील तीन दिवस 13 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता
पुणे प्रतिनिधी
राज्यभरात बहुतेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पलीकडे पोहोचलेला असताना पुढील तीन दिवस 13 जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
कर्नाटकच्या उत्तरेपासून मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणोत्तर दिशेस सक्रिय आहे. शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वारे चक्राकार वारे वाहच असून पश्चिमी वाऱ्यांचा वेगसुद्धा अधिक आहे. हवामानाच्या या स्थितीमुळेच राज्याच्या बहुतांश भागात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकण परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारपर्यंत उन्हाच्या काहिलीने तापलेल्या सोलापूर आणि अकोला या शहरांना पावसाने झोडपले तर राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे दिसून आले.
