समृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर
पुणे : समृद्ध भारत घडवण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे योगदान देणे अत्यावश्यक आहे. तरुणांनी केवळ नोकरीकडे न पाहता रोजगारनिर्मितीकडे वळावे, नवीन संधी शोधाव्यात आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रख्यात अर्थकारण व समाजकारण अभ्यासक दीपक करंजीकर यांनी केले.
नागरिक सोशल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “समृद्ध भारत आणि मी” या विषयावरील व्याख्यानात करंजीकर बोलत होते, या प्रसंगी नागरिक सोशल फाउंडेशनचे संचालक प्रितम थोरवे,अमेय सप्रे, शेखर यादव, वक्ता विभागाचे प्रमुख दीपक मेहेंदळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना करंजीकर म्हणाले, भारताची समृद्धी ही केवळ आर्थिक बाबींवर अवलंबून नसून, सांस्कृतिक मूल्ये, नैतिकता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकता या घटकांवरही तितकीच अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल युगात भारत वेगाने प्रगती करत असताना, त्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी युवकांवर आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात करंजीकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानकारक पद्धतीने दूर केल्या. यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि प्रभावी ठरला.
