Thursday, June 11, 2026
Latest NewsPUNE

अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व आजही प्रेरणादायी;  इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत 

पुणे : अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांनी आपल्या केवळ ४० वर्षांच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक लढाया लढल्या. आणि
आपल्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यामध्ये रूपांतर केले. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वीरतेपेक्षा त्यांचे नाव केवळ ‘बाजीराव-मस्तानी’ यासाठीच घेतले जाते आणि याचे मनस्वी दुःख होते. हा केवळ त्यांचाच नव्हे, तर इतिहासाचाही अपमान आहे. बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले.
योगी अरविंद सांस्कृतिक मंच आणि भारत विकास परिषद, दक्षिण पुणे शाखेतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना जगन्नाथ लडकत यांनी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई ‘ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री योगी अरविंद सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष शिरीष सुमंत तसेच भारत विकास परिषदेचे पश्चिम प्रांत अध्यक्ष शशिकांत पदमवार , ॲड.चंद्रशेखर कुलकर्णी, प्रशांत गोऱ्हे , रमेश भागवत , कमोडर श्रीकांत देशमुख , विजय पानवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगन्नाथ लडकत म्हणाले, बाजीराव पेशव्यांनी पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम केले. या शनिवारवाड्यातूनच एकेकाळी संपूर्ण हिंदुस्तानचे सूत्र हलविण्यात येत होते. इतकी जरब आणि ताकद बाजीराव पेशव्यांच्या कर्तृत्वात होती. पालखेडची लढाई ही केवळ त्यांच्या नव्हे, तर हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.
अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व विविध माध्यमांतून समाजासमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विविध संस्थांनी व्याख्यानमाला आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व समाजासमोर आणले पाहिजे. आज मात्र त्यांचे पूर्णाकृती पुतळे सर्वत्र उभे राहताना आनंद होत आहे. योध्याला जात नसते योद्धा हा त्याच्या शौर्य गुणामुळेच समाज माणसात ओळखला जातो आणि म्हणून अजिंक्य योद्धा बाजीरावांना जातीच्या कोंदणात अडकवू नका. त्यांचा जाज्वल्य इतिहास तरुण पिढीसमोर मांडल्यास तो निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
शशिकांत पदमवार म्हणाले, भारत विकास परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर चालणारी संघटना आहे. ही संस्था प्रामुख्याने अपंगांना कृत्रिम पाय बसविण्याचे काम करते. आतापर्यंत आसाम, बिहार, महाराष्ट्र आणि बेळगाव येथे शिबिरे आयोजित करण्यात आली असून, या माध्यमातून हजारो अपंगांना कृत्रिम पाय बसविण्यात आले आहेत. प्रियंका गोगटे यांनी सूत्रसंचालन केले. सुनित्रा मंकणी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading