Sunday, September 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईच्या गतिमान विकासामुळे खूष झालेली गावकी ठाकरेंच्या भावकीवर भारी पडणार

 

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची बोचरी टीका

मुंबई महापालिका निवडणुकीत पराभवाच्या भीतीपोटी भावकीला एकत्र आणण्याचा घाट ठाकरे बंधूंनी घातला आहे. मात्र गावकी पुढे भावकी चालत नाही या म्हणीनुसार मुंबईतील मतदारांची गावकी ही राज्यात होणा-या गतिमान विकासामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसोबत आहे. मुंबईच्या गतिमान विकासामुळे राज- उद्धव यांच्या भावकीला थारा मिळणार नाही, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी श्री. बन म्हणाले की, निवडणुका लागल्या की मराठी च्या नावाने गळा काढायचा मात्र मराठी माणसाच्या हितासाठी काही काम करायचे नाही हे उबाठा – मनसे चे धेरण आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोणी तुंबड्या भरल्या, कोणी आपल्या घराचे इमले वाढवलेत हे मुंबईकरांनी पाहिले आहे.

115 जागा जिंकण्याचा राऊतांचा दावा म्हणजे हास्यास्पद

मुंबई महापालिका निवडणुकीत 115 जागा जिंकणार हा राऊतांचा दावा हास्यास्पद आहे. राऊतांनी आत्तापर्यंत जेवढे दावे केले आहेत त्याच्या नेमके उलटे निकाल लागतात हा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील, पंतप्रधान राहुल गांधी होतील या आणि अशा अनेक पोकळ दाव्यांची यादी भलीमोठ्ठी असल्याची खिल्ली श्री. बन यांनी उडवली. राऊतांनी राजकारण सोडून ज्योतिष सांगण्याचा धंदा सुरू केला पण तोही अयशस्वी ठरत आहे असा टोमणा मारला. मुंबई पालिका निवडणुकीत भाजपा, खरी शिवसेना यांच्या 150 जागा निवडून येतील हे राऊतांनी ध्यानात ठेवावे असे स्पष्ट केले.

भाजपाच्या स्टार प्रचारकांवरून टीका करण्याची लायकी राऊतांची नाही. भाजपाचे स्टार प्रचारक हे हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जाणारे आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. राऊत तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत ? त्यांची यादी जाहीर करा असे आव्हान देत श्री. बन यांनी राऊतांची कोंडी केली. उबाठा गटाच्या स्टार प्रचारकांमध्ये राशीद मामू पासून याकूब मेमनचे वारसदार, अफजल खानाचे वारसदार, औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर या सगळ्यांचा भरणा आहे अशी टीका केली.

उद्धव ठाकरेंना मुंबईकरांच्या हिताशी देणेघेणे नाही उबाठा गटाला आपल्या कुटुंबियांचे व्यवसाय चालवण्यासाठीच मुंबई पालिका ताब्यात हवी आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास वेगाने सुरू त्यांच्या नावाचे नमो बॅनर लावले तर त्यात वावगे काय असा परखड सवालही श्री. बन यांनी केला.

आता राज ठाकरे भगवी शाल पांघरणार का ?

मनसेचे इंजिन चालवायचं असेल तर मागे डब्बे जोडलेले असावे लागतात मात्र मनसेच्या इंजिनाच्या मागे एकही डब्बा शिल्लक राहिलेला नाही. हे इंजिन कधी युटर्न घेईल याची शाश्वती नसते म्हणूनच जुने कार्यकर्ते सोडून जात असल्याची टीका श्री. बन यांनी केली. राज ठाकरे हे भगवी शाल पांघरून मते मागणार की हिरवी शाल पांघरून मागणार हे राज यांनी स्पष्ट करावे असेही श्री. बन म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading