Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण

पुणे  : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आज (१० डिसेंबर) रोजी दुपारी ३ वाजता सवाईच्या ७१ व्या महोत्सवाला सुरुवात होईल.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी १० ते १४ डिसेंबर दरम्यान ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी सुमारे ८ ते १० हजार संगीत रसिकांना सामावून घेणा-या भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.

महोत्सवासाठी येणा-या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी महोत्सवाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, कार्यक्रमाचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीपेक्षा मोठ्या
एलईडी स्क्रीन्स आणि कलाकारांचा आवाज शेवटच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यांसोबतच अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृहे मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएल तर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही जोशी यांनी नमूद केले.

यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात . १० डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहनाईवादनाने होईल. लोकेश यांनी आपले वडील कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांकडे शहनाईवादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. किराणा घराण्याच्या गायिका असलेल्या डॉ चेतना पाठक यानंतर आपली गायनसेवा सादर करतील. डॉ. पाठक या स्वरयोगिनी प‌द्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. यानंतर बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र- शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन संपन्न होईल. भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य असलेले पं शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव- दे-हास हे यानंतर सतार व चेलो असे सहवादन प्रस्तुत करतील. मूळच्या नेदरलँड्सच्या असलेल्या सास्किया यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताची दीर्घकालीन साधना केली असून ‘भारतीय चेलो’ या अ‌द्वितीय वा‌द्याची निर्मिती करून त्यांनी पूर्व व पश्चिम संगीत परंपरांमध्ये नवे पूल बांधले आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading