पहलगाम दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश – विजय वडेट्टीवार
मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. ज्यावेळी या हल्ल्याची कटकारस्थानने केली जात होती, त्यावेळी गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. हा हल्ला म्हणजे दोन धर्मीयांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याच्या कटाचा भाग असू शकतो, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली.
पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या दोन गटांनी पर्यटकांना घेऊन त्यांच्यावर अंदाधुद गोळीबार केला. या हल्ल्यात 28 जण मरण पावले आहेत तर 20 हून अधिक जण जखमी आहेत. या हल्ल्याचा निषेध करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
पहलगाम हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक आलेले असताना हल्ला झाला त्या जागेवर एकही सुरक्षारक्षक अथवा पोलीस का उपस्थित नव्हता, असा सवाल करतानाच वडेट्टीवार यांनी हा हल्ला म्हणजे सरकारचे अपयश असल्याची टीका केली. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
काश्मीरमधून हिंदू धर्मीय मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत आहेत. ही बाब योग्य नाही. राज्यातील दहशतवाद अजून संपलेला नाही. नोटबंदी केल्यानंतर दहशतवाद संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र अजूनही दहशतवाद अस्तित्वात आहेच, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधी भारतात परतणार
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या हल्ल्यानंतर आपला अमेरिका दौरा आटोपता घेऊन भारतात परतणार आहेत. सध्या ते या हल्ल्याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
