Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

युपीएससी २०२४ मध्ये दीपस्तंभ ‘मनोबल’च्या १८ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; यामध्ये ७ दिव्यांगांचा समावेश!

फाऊंडेशनचा मनू गर्ग प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये भारतात प्रथम!

पुणे  : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला असून, यात दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या १८ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे या १८ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थी हे दिव्यांग आहेत.

२००४ साली यजुर्वेन्द्र महाजन सर यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण, कौशल्य विकास यांवर फाऊंडेशन काम करीत होते. मात्र समाजातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिक दृष्ट्या वंचित तरुण तरुणींची संख्या लक्षात घेत त्यांना शिक्षणाची आणि त्याही पेक्षा जास्त समाजातील मुख्य प्रवाहात येण्याची गरज लक्षात आल्यानंतर त्यांचे जीवन अधिक सुखकर करीत त्यांना हक्काचे शिक्षण व नोकरीच्या संधी मिळाव्या या हेतूने ‘मनोबल’ या प्रकल्पा अंतर्गत त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात झाली.

या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी आवश्यक सर्व सोयी फाऊंडेशनच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे या सर्व सोयी आणि मार्गदर्शन हे मोफत दिल्या जाते. आज पुणे आणि जळगाव या दोन ठिकाणी संस्था निवासी प्रकल्प चालवीत असून ऑनलाईन पद्धतीने देशभरातील विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वतीने मार्गदर्शन देखील करण्यात येते. निवासी प्रकल्पांच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास आवश्यक बाबी, वातावरण आणि शैक्षणिक पाठबळ पुरविले जाते.

आज यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग (AIR91), रवी राज (AIR182), प्रणव कुलकर्णी (AIR 256), पुष्पराज खोत (AIR304), श्रीरंग काओरे (AIR396), बिरदेव डोणे (AIR551), रोहन पिंगळे (AIR581), वेदान्त पाटील (AIR601), ओंकार खुंटाळे (AIR673), अभिजीत अहेर (AIR734), श्रीतेश पटेल (AIR746), तुषार मेंदापारा (AIR), हर्षिता मेहनोत (AIR766), संपदा वांगे(AIR839), मोहन (AIR984), मयंक भारद्वाज (AIR985), संकेत शिंगाटे (AIR479), दिलीप कुमार देसाई (AIR605) यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना आनंद पाटील (IAS), वैभव निंबाळकर (IPS), सागर डोईफोडे(IAS), धिरज मोरे(IRS), पूजा कदम (IRS), मिलिंद पाटील (विभागप्रमुख, दीपस्तंभ) यांच्याबरोबर ४० अधिकाऱ्यांच्या टीमने मार्गदर्शन केले आहे अशी माहिती मनोबलचे प्राध्यापक अमोल लंके यांनी दिली.

यावेळी बोलताना दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन सर यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण समाजाला नवी दिशा मिळेल. मनोबल प्रकल्पाचा खरा उद्देशच अशा क्षणांना आकार देणं हाच आहे.”

यशस्वी विद्यार्थ्यांपैकी मनू गर्ग (AIR 91) यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मी २०२१ पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेलो आहे. दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध असलेले अ‍ॅक्सेसेबल स्टडी मटेरियल, वैयक्तिक मार्गदर्शन, आणि सतत प्रेरणा देणारे अभ्यासपूरक वातावरण—यामुळे युपीएससी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. माझ्या या यशाच्या प्रवासात दीपस्तंभ मनोबलने दिलेल्या अमूल्य योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading