Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वर्तमान परिस्थितीशी निर्भिडपणे लढा! – ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे : इतिहास विसरलो तर वर्तमान परिस्थितीशी लढायला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे इतिहास विसरू नका. तो समजून घ्या. आंबेडकरी चळवळीत आपण किती टप्पे गाठले याची जाणीव नसल्याने अनेकदा आपलेच लोक त्या चक्रात अडकतात. पण आपल्याला इतिहास माहिती असेल तर वर्तमान परिस्थिती निर्भिडपणे लढता येते, ती लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आंबेडकरी चळवळीच्या कालखंडातील महत्त्वाच्या टप्प्यांचा दस्तऐवज असलेले “सम्यक ते वंचित : चळवळीचा दस्ताऐवज” या शांताराम पंदेरे यांनी संकलित केलेल्या ग्रंथाचे पुण्यातील निळू फुले सभागृहात प्रकाशन झाले. याप्रसंगी ॲड. आंबेडकर बोलत होते.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देताना, त्यांनी 1977 नंतरच्या राजकीय घडामोडी, रशियाच्या उदाहरणाने दाखवलेली दूरदृष्टी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील सरकारी लाठीमार आणि जनतेमध्ये पसरवलेली दहशत यावर सखोल विवेचन केले.

ॲड. आंबेडकर म्हणाले, मी लोकांमध्ये बसून चर्चा केल्या, भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून १९८२-८३ ला नाशिक ते मुंबई लॉंग मार्चचा निर्णय झाला आणि त्यातून लोकांचा चळवळीवरचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला. चळवळीत नेमकं काय साधायचं आहे, हे लक्षात ठेवा. टीकाकारांना घाबरण्याचे कारण नाही. निर्भिडपणे आपले मत मदत रहा. वाचन करून समजून घेणे, निर्णयक्षम होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “टीव्हीवर जे दिसते आणि वर्तमानपत्रात जे छापून येते ते तपासून घ्या. लगेच खरे मानू नका, विचार करा, तपासा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. वि. पवार, शांताराम पंदेरे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, प्रा. संजीव चांदोरकर, ॲड. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, देवेंद्र उबाळे, पुष्पाताई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

“सम्यक ते वंचित” हे पुस्तक केवळ दस्ताऐवज नसून, ती एका कालखंडाची जिवंत साक्ष आहे, असे मत या वेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. पत्रकार उत्तमकुमार इंदोरे यांनी सूत्रसंचालन केले, पत्रकार धनाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केले. जितरत्न पटाईत यांनी आभार मानले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रकाशन

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सुरुवातीच्या सामाजिक राजकीय प्रवासापासून सोबत असलेले आणि सम्यक समाज आंदोलन, भारिप, भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण प्रवासातील सहकाऱ्यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये पुष्पाताई इंगळे, वसंतदादा साळवे, दिशा पिंकी शेख, ॲड. अरुण जाधव हे या संपूर्ण प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यावरील कार्यकर्ते पदाधिकारी प्रातिनिधिक स्वरूपात या सोहळ्याला उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading