इंडी आघाडीचा खोटारडेपणा उघड पाडणार! – चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा मुद्दा महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय देणारा असेल. महायुतीजवळ विकासकामांची शिदोरी असून इंडी आघाडीचा खोटारडेपणा उघड पाडणार आहोत, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकारांचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा नाही.
पुणे येथे भाजपा सांस्कृतिक प्रकोष्टतर्फे सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असताना ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण योग्य पद्धतीने मांडले नाही. उद्धव ठाकरे कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते, राहणारही नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची कायम अवहेलना केली आहे.
• ठाकरेंनी ७०० कोटी जाहिरातीवर खर्च केले
सरकारी योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचून त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, यासाठी सरकार जाहिरात करीत आहे. मोठ्या योजनांच्या जाहिराती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केल्या जातात. त्यांचा फायदा होत आहे. योजना चांगली असल्याने १ कोटी अर्ज आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना ७०० कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.
– ते असेही म्हणाले –
- भ्रष्ट्राचारयुक्त काम होऊ नये, यासाठी आशीष शेलार यांची भूमिका आहे. काम करताना कंत्राटदार चुका करत असेल तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही टीका करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांचा यात काहीही संबंध नाही.
- अजितदादांनी दिल्लीवारी कशी केली हे योग्य पद्धतीने आणि मनमोकळेपणाने सांगितले आहे. त्यांनी जीवनातील घडामोडी सांगितल्या, त्यावरून राजकारण करायची काय गरज? सकाळी ९ वाजता झोपेतून उठून नौटंकी करणारे असे बोलतात.
- राज ठाकरेंनी मोदीजी पंतप्रधान व्हावेत, याला पाठिंबा दिला होता. पण पुढच्या निवडणुकीला समर्थन नाही, हेही त्यांनी सांगितले होते. राजकारणात उद्या काय होईल हे माहिती नाही, पण त्यांनी निर्णय केला असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
- अश्विनी वैष्णव १८ तास काम करतात, अपघातस्थळी तत्काळ पोहोचतात. त्यांच्या कर्तृत्वावर बोलण्याआधी आदित्य ठाकरे यांनी स्वतःची उंची तपासावी.
