Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

संतांनी जातीभेद विसरून सर्वांना सामावून घेण्याची दिली शिकवण – आमदार अश्विनी जगताप

पिंपरी :  महाराष्ट्राला धारकरी आणि वारकरी अशी मोठी परंपरा आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तर दुसरीकडे संतांच्या छत्रछायेखाली एकवटलेला वारकरी संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी कुठल्याही जातीभेदाला थारा न देता सर्वांना सामावून घेत पंढरीची वारी सुरू केली. आज शेकडो वर्षे झाली ही वारी आणि वारकरी संप्रदाय जातीभेद विसरून देवाप्रती समर्पण भावनेने विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले आहेत. ज्ञानोबा तुकोबांची ही शिकवण महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनामनात रुजलेली आहे. अशा या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिंडी प्रमुख आणि भजनी मंडळांचा यथोचित सन्मान करून नवा आदर्श भाऊसाहेब भोईर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेने घालून दिलेला आहे; ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने शहरात दाखल झालेल्या दिंड्यांमधील दिंडी प्रमुख तसेच भजनी मंडळाच्या प्रमुखांचा
सन्मान गुरुवारी (२७ जून) ग. दि. माडगूळकर सभागृह निगडी येथे करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड मराठी नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सुनील महाजन, माजी नगरसेवक नाना काटे, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, आप्पा बागल, सुरेश भोईर, कुणाल वाव्हळ, अनंत कोऱ्हाळे, राहुल भोईर, नाट्य परिषदेचे जयराज काळे, किरण येवलेकर, रुपाली पाथरे, हभप नीलम शिंदे, आसाराम कसबे, राजेंद्र बंग, संतोष रासने आदी उपस्थित होते.
पुरोगामी महाराष्ट्रात संतांचे विचार खोलवर रुजलेले आहेत महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा आहे परंतु आज महाराष्ट्रातील एकंदर वातावरण पाहता वारकरी संप्रदायाने राजकारण्यांवर अंकुश ठेवला पाहिजे वेळप्रसंगी त्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत, असे भाऊसाहेब भोईर म्हणाले.
यावेळी दिंडी प्रमुख हभप राजेंद्र महाराज शेलार, हभप सुदाम महाराज नखाते, हभप सिताराम महाराज मातेरे, हभप अनंत महाराज मोरे, हभप दळवी महाराज, हभप कैलास महाराज साठे, हभप सुचिता गटणे, हभप विजया साठे, हभप बाळासाहेब शितोळे, भजनी मंडळाच्या नंदा ढोरे, उर्मिला चव्हाण, शैलजा कुलकर्णी, लता कांचन, राजाभाऊ कड, जयवंत चांदेरे, श्याम महाराज देशमुख, काळूराम इंगवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, कान्होपात्रा पवार, हनुमान भजनी मंडळ तसेच भगवत गीतेतील श्लोक मुखोदगत केलेल्या श्रावणी नाईक आणि बाळासाहेब मरळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन विनायक रणसुभे तर किरण येवलेकर यांनी आभार मानले. यानंतर संतपरंपरेच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य करणाऱ्या सुमित्रा भावे निर्मित आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दिठी’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील वारकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading