जागावाटपाच्या चर्चेवरून मिटकरींनी शंभूराज देसाई यांना सुनावले
मुंबई: महायुतीच्या जागावाटपाची चर्चा प्रसारमाध्यमांसमोर करण्याची गरज नाही. सर्व घटकपक्षाचे प्रमुख नेते त्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील, अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांना सुनावले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत 50, 55 जागांवर आमचे समाधान होईल असे नाही. पण प्रत्येकाला 100, 100 जागा हव्या असतील तर सर्वांना स्वतंत्रपणेच लढावे लागेल, असे विधान मिटकरी यांनी केले आहे. पूर्वपरवानगीशिवाय राजकीय विधाने करू नयेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावले असूनही मिटकरी यांनी हे विधान पक्षाच्या परवानगीने केले आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे..
विधानसभा निवडणुका तीन-चार महिन्यांवर येऊन ढेपले असताना महाविकास आघाडीने जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित केले आहे. महायुतीत मात्र भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात कोण किती जागा लढविणार याबद्दल संभ्रम आहे. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाव्या, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचीही अपेक्षा आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हे देखील काही जागांचा वाटा मागणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होऊन आपल्या वाट्याच्या जागांची मागणी करणार का, हा देखील प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांच्यासारख्या नेत्यांच्या विधानाने संभ्रमात भरच पडत आहे.
