मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर?
मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) राज्यात लागू करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला असून आज पुन्हा एकदा जरांगे पाटील आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. उपोषणा दरम्यान आपण कोणत्याही नेत्याशी संवाद साधणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात मराठा आरक्षणा विषयी ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्यभर उद्रेक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे किंवा मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नांदेड – हैद्राबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथे विजेच्या टॉवरवर चढून राज्य सरकार विरोधातील रोष व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यास त्यांनी दिल्लीतून आरक्षण घेवूनच परत यावे, असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.
