Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव 


पिंपरी : रोपलागवड, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणा संदर्भात समाजात जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन २०१८ करिता सेवाभावी संस्था संवर्गामध्ये राज्यस्तरीय व पुणे विभागस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणूगोपाल रेड्डी, मुख्य वनसंरक्षक वाय.एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) बाणेर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
            हा पुरस्कार मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, दिलीपराव देशमुख – बारडकर, सूर्यकांत कुरुलकर, रमेश जाधव, वामन भरगंडे, बळीराम माळी, प्रकाश इंगोले, दत्तात्रय राठोडे, शंकर तांबे, नितीन चिलवंत, शिवकुमार बाईस, प्रवीण घटे, अमोल लोंढे आदींनी स्वीकारला. 
            यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव केला. समाजात फार थोडे लोक असे आहेत की आपला उद्योग व्यवसाय सांभाळत समाजाच्या कल्याणाचा विचार करतात, असे सांगितले.
            पुरस्काराबद्दल अरुण पवार म्हणाले, की सामाजिक वनीकरण विभागाने आमच्या खांद्यावर ही अनोखी पुरस्काररूपी थाप दिली आहे. नियोजन करून वनेतर क्षेत्रात वृक्षारोपण केले, तरच झाडे जगतात. याप्रमाणे मराठवाडा जनविकास संघाने जागेचा शोध, रोपांची निवड आणि स्वयंसेवकांची सवड अशा त्रिसुत्रीचा मेळ बसवत कामाचा आलेख उंचावत ठेवला आहे. मदत करणारे अनेक हात आमच्या हातात मिळाले आहेत. आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पवित्र भूमीत झाडे लावू शकलो. सामाजिक वनीकरण पुणे विभाग यांचा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ मिळणे, ही खरोखर आनंददायी बाब आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत नाही. 
          अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक झाडे लावून त्यांचे टँकरद्वारे पाणी घालून संगोपन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading