Wednesday, May 27, 2026
Latest NewsNATIONALPUNE

सागरी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक – अनुप मुदगल

पुणे : ” विस्तृत सागरी किनारा, आणि हिंद महासागरात धोरणात्मक दृष्ट्या असलेले महत्वपूर्ण स्थान यामुळे भारतीय सागरकिनारा हा अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरतो. मात्र प्रभावी व्यवस्थापनाचा विचार करता, जगातील इतर बंदरांच्या तुलनेत भारतीय बंदरे ही पिछाडीवर आहे. सागरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब मारक ठरते. त्यामुळेच भविष्यात सागरी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक आहे,” असे मत मॉरिशस येथील भारताचे माजी राजदूत आणि भारताच्या सागर व्हिजन’चे निर्माते अनुप मुदगल यांनी व्यक्त केले.

मरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी)  (Maritime Research Centre) व इंडो-स्विस सेंटर फॉर एकलेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एच टी पारेख फाऊंडेशन व सीओईपी महाविद्यालय यांच्या सहकार्याने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ इन्स्टिट्यूशनलाईज्ड स्कीलिंग इकोसिस्टम फॉर एनहान्सड रियलायझेशन ऑफ सागर व्हिजन’ असे या कार्यशाळेचे नाव असून, तीन टप्प्यात आयोजित या कार्यशाळेचा पहिला टप्पा ६ ते १० मार्च या कालावधीत शिवाजीनगर येथील सीओईपी महाविद्यालय येथे संपन्न होत आहे. या कार्यशाळेत मंगळवारी, मुदगल यांनी ‘ ब्ल्यू इकॉनॉमिक परस्पेक्टीव्ह ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कौशल्य विद्यापीठाच्या उप-कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर,आयआयटी गुवाहाटी येथील प्राध्यापिका आणि ब्रम्हपुत्रा नदी प्रकल्पावर काम केलेल्या डॉ. अनामिका बरूआ, मुंबई येथील एक्सेल इंडस्ट्रीज’चे अश्विन श्रॉफ, एमआरसीचे संस्थापक संचालक कमांडर डॉ. अरनब दास (निवृत्त), एमआरसीचे सल्लागार प्रफुल तालेरा हे उपस्थित होते.

यावेळी सागरी अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर बोलताना मुदगल म्हणाले, ” सागरी अर्थव्यवस्थेचा विचार करता, त्यामध्ये उर्जा, अन्न, पर्यटन, जहाजबांधणी व व्यापार आणि पर्यावरणीय परिणाम असे पारंपारिक क्षेत्र तसेच जैवविविधता, पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अशा आधुनिक क्षेत्रांचा समावेश होतो. या विविध क्षेत्राशी निगडीत असलेल्या या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अपल्याकडे आवश्यक असलेल्या ज्ञानाची मोठी कमतरता आहे. त्याचबरोबर या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा विकास आणि शाश्वत दृष्टिकोन याबाबतही मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजे.”

या कार्यशाळेत डॉ. पालकर यांनी सागरी क्षेत्र जागरूकता या विषयाच्या दृष्टीने कौशल्य विकासाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर डॉ. बरूआ यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमातून सागरी क्षेत्र या विषयाचा समावेश होण्याची गरज व्यक्त केली. तर प्रफुल तालेरा यांनी भारतात जहाजबांधणी उद्योगाच्या भरभराटीसाठी तरुणाईमध्ये कौशल्य विकासाची आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दास यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading