टीसीआयच्या सहामाही निव्वळ नफ्यात १४.५ टक्के वाढ
मुंबई : भारतातील अग्रगण्य एकात्मिक पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सोल्यूशन्स पुरवठादार कंपनी टीसीआय अर्थात ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आज दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) महसूल आणि नफ्यात चांगली वाढ नोंदवली आहे. या सहामाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १४.५ टक्के तर निव्वळ महसूलात २३ टक्के वाढ झाली आहे.
कंपनीच्या सहामाही कामगिरीची वैशिष्ट्येः
आर्थिक वर्ष २०२२ मधील पहिली सहामाही आणि चालू आर्थिक वर्षातील सहामाहीतील तुलनात्मक कामगिरीनुसार कंपनीच्या निव्वळ कामकाजी महसूलात या सहामाहीत वार्षिक तुलनेत २३ टक्के वाढ होऊन १६५८ कोटी रुपये महसूल झाला आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए २१४ कोटी रुपये असून आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत तो १८६ कोटी रुपये होता. ईबीआयटीडीए मार्जिन १२.९२ टक्के असून आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत तो १३.८३ टक्के होते. करोत्तर नफा या गेल्या आर्थिक वर्षातील सहामाहीतील ११७ कोटी रुपयांच्या तुलनेत या सहामाहीत १३४ कोटी रुपये आहे.
एकत्रित स्वरुपातील नफा आणि महसूलाची आकडेवारी:
कंपनीच्या एकत्रित कामकाजी महसूलात या सहामाहीत वार्षिक तुलनेत २१ टक्के वाढ होऊन १८३६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. या सहामाहीत ईबीआयटीडीए २३६ कोटी रुपये असून आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत तो १९८ कोटी रुपये होता. ईबीआयटीडीए मार्जिन १२.८६ टक्के असून आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत तो १३.०२ टक्के होते. कंपनीचा करोत्तर नफा या गेल्या आर्थिक वर्षातील सहामाहीतील १२४ कोटी रुपयांच्या तुलनेत या सहामाहीत १५१ कोटी रुपये आहे.
टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्हणाले, “कंपनीने चालू आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही आणि पहिल्या सहामाहीत सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. महागाईचा दबाव असूनही ऑटोमोबाईल आणि उपभोग क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे सर्वप्रकारच्या व्यवसायांमध्ये चांगली वाढ झाली आहे. तसेच कंपनीने मुख्य व्यवसायाच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने त्याचाही फायदा कंपनीच्या नफ्यातील आणि महसूलातील वाढीसाठी झाला आहे.
कंपनी तिच्या विस्तृत मल्टीमॉडल नेटवर्क, ग्राहकांच्या गरजेनुसार सेवा उपलब्धतेमुळे, योग्य तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि ऑटोमेशनच्या उत्तम वापरामुळे या बाजारपेठेतील आपले आघाडीचे स्थान टिकवून आहे.
पंतप्रधान गतीशक्ती आराखड्यासह राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाच्या शुभारंभामुळे अखंड मल्टीमोडल वाहतूक आणि आधुनिक कनेक्टिव्हिटीला चालना मिळत असून, डिजिटायझेशनमधील प्रगती आणि वाढते प्रमाणीकरण देशातील लॉजिस्टिक सुविधा अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. टीसीआय या सर्व संकल्पनांवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी, व्यवसायवाढीसाठी कार्यरत आहे.”
