राज्यातील एसटीचे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत
मुंबई : एसटी महामंडळ प्रशासनाने चालक वाहकांचे पगार अगोदर करून एक आदर्श निर्माण केला आहे. तर राज्यातील पंधरा हजारांवर अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन थांबवले आहे. यात औरंगाबादेतील पावणेदोनशे अधिकारी कर्मचा-यांचा समावेश आहे. वेतन वेळेत न मिळाल्याने ते नाराजी व्यक्त करत आहे.
ऐरवी एसटी अधिकारी व कर्मचा-यांना पहिले वेतन देऊन चालक व वाहकांचे वेतन थकत असे. यावरून प्रचंड गदारोळ होत होता. आंदोलन पुकारले जात असे. यंदा मात्र, महामंडळ प्रशासनाने अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन थांबवून चालक व वाहकांना अगोदर पगार दिला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. चालक व वाहक आनंद व्यक्त करत असून बसही सुसाट धाऊ लागल्या आहेत. काही अधिकारी व कर्मचा-यांनी याचे स्वागतही केले आहे.
मात्र, त्यांचे वेतन थकले व ते वेळेत होत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळी पंधरा दिवसांवर येऊ ठेपली आहे. बँक हप्ते, घर भाडे, कुटुंबाचा उदनिर्वाह, आदी खर्च कसा पूर्ण करावा, असा यक्ष प्रश्न त्यांना पडलेला आहे.
विविध कंपन्यांकडून कामगारांना बोनस वाटप करण्यात येत आहे. सानुग्रह अनुदान दिले जात आहे. मात्र, एसटीचे कामगार व कर्मचारी, अधिका-यांबाबात महामंडळ प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. अधिका-यांना व कर्मचा-यांना वेतनच मिळाले नाही त्यामुळे यंदाची दिवाळी कशी जाणार याबाबत तेचिंतातूर झाले आहेत. वेतन, बोनस, सानुग्रहाची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे.