एसएनबीपी हॉकी स्पर्धेत १५ राज्यांचा विक्रमी सहभाग
या वर्षी दोन्ही स्पर्धेतून एकूण ३.८० लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. मुलांची स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर, तर मुलींची स्पर्धा राज्य स्तरावर घेण्यात येणार आहे. मुलींच्या स्पर्धा विभागात पारितोषिक रकमेत ५५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून, एकूण १ लाख ५५ हजार रुपयाची पारितोषिके दिली जातील. विजेता संघ ७५ हजार रुपये पारितोषिकाचा मानकरी होईल. उपविजेत्यास ५० हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ३० हजार रुपये दिले जातील.
मुलांच्या स्पर्धेस म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संस्थेत ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल. अंतिम सामना ७ ऑक्टोबर रोजी होईल. मुलींची स्पर्धा ४ ऑक्टोबर रोजी सुरु होईल. ही स्पर्धा चिखली मोशी येथील दशरथ भोसले हॉकी मैदानावर होईल.
राष्ट्रीय पातळीवर १६ वर्षांखालील गटासाठी रोख पारितोषिक मिळणारी ही एकमेव स्पर्धा ठरली आहे. या वर्षी ऑलिंपियन विवेक सिंग अॅकॅडमी, वाराणसी, विष्णूपूर हॉकी, मणिपूर, या संघांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. वाराणसीच्या संघाने सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरी पर्यंत मजल मारली होती. मणिपूरचा संघ स्पर्धेत प्रथमच खेळणार आहे.
हॉकीचा प्रसार हे आमचे उद्दिष्ट कायम आहे. यंदा आमचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही या वेळी मुलींच्या स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. देशातील अन्य संघांनाही आमच्या स्पर्धेने आकर्षित करावे अशी आमची इच्छा आहे, असे संयोजन समितीच्या कार्याध्यक्ष आणि एसएनबीपी समूहाच्या अध्यक्ष डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या.
मुलांच्या १६ वर्षांखालील स्पर्धेत २४ संघांचा सहभाह असेल. स्पर्धा प्रथम साखळी आणि नंतर बाद फेरी पद्धतीने खेळविली जाईल. सहभागी संघांना आठ गटात विभागण्यात आले आहे. गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्य फेरीचे सामने ५ आणि १४ ऑक्टोबरला खेळविण्यात येतील. प्ले ऑफ लढती ७ ऑक्टोबरपासून होतील.
मुलांच्या गटातील विजेत्यास रोख १ लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. उपविजेता संघ ७५ हजार, तर तिसऱ्या क्रमांकावरील संघ ५० हजार रुपयाचा मानकरी होईल.
राज्य स्तरावर होणाऱ्या मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील संघ सहभागी होतील. यात प्रामुख्याने नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा जिल्हा संघांसह क्रीडा प्रबोधिनी, एसएनबीपी अकादमी, रोव्हर्स अकादमी या संघांचा सहभाग असेल. ही स्पर्धा थेट बाद फेरी पद्धतीने होईल.
या स्पर्धेतून अकादमी आणि शालेय स्तरावरील खेळाडूंना एकत्रित खेळण्याची संधी मिळेल. स्पर्धेत एकूण ४८० खेळाडूंचा सहभाग असून, एकूण ३४ सामने खेळविण्यात येतील. स्पर्धेत २५ तांत्रिक अधिकारी देखिल सहभागी होणार आहेत. दोन्ही स्पर्धा हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.