आदित्य ठाकरे यांनी आपलं सुरक्षा कवच सोडावं -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे:आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने सुरक्षा रक्षक दिलेत. पण त्यांना गाड्या दिलेल्या नाहीत. तर या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्या सुरक्षेसाठी किती सुरक्षारक्षक द्यायचे, त्यांना गाड्या द्यायच्या की नाही. हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे. त्यांची ती जबाबदारी आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. त्यांच्याच भरोश्यावर हा दौरा करतोय. असे त्यांनी सांगितले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी त्यांचं सरकार गेलंय हे लक्षात ठेवावं. त्यांनी स्वत:हून आपलं सुरक्षा कवच सोडावं. स्वत:चं ग्लोरीफिकेशन करणं थांबवावं, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुण्यात लंपी आजाराबाबत औंध येथे पशुवर्धन आयुक्तालय येथे आढावा घेतला त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. फॉक्सकॉन – वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. असा आरोप शरद पवारांनी काल केला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आमच्या सरकारवर टीका करण्यापूर्वी शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांनी राज्यात कोणते प्रकल्प आणले? जनहिताची कोणती कामे केली? असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.
फॉक्सकॉन वेदांता बाहेर गेला याला महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता कारणीभूत आहे. त्यांनी योग्य पाठपुरावा केला नाही. तिघांचे आघाडी सरकार होते. त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला नाही. तरीदेखील आता आमचं सरकार मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
