देशाला एकत्र ठेवण्यासाठी राष्ट्रप्रेम हा एकमेव पर्याय आहे – बसवराज बोम्मई
पुणे : “ देशाला एकत्र ठेवण्यासाठी राष्ट्रप्रेम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आपण आपल्या राष्ट्रावर प्रेम केले पाहिजे. आज ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाद्वारे सध्या ४० कोटींपेक्षा अधिक घरांवर आपला राष्ट्रध्वज फडकविला जात आहे,’’ असे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे हडपसर येथील अमनोरा टाऊनशिप येथे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कर्नाटक विधानसभेचे आमदार सी. टी. रवी, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे तसेच आदित्य देशपांडे आणि विवेक कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी भागवत पाटील, सौरभ पुसाडकर, सोनाल जोशी, अमित शर्मा आणि शीतल पाटील यांना मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते तिरंगा प्रदान करण्यात आला.
बोम्मई पुढे म्हणाले, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जागतिक स्तरावर आर्थिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण केले आहे. भारताने कोविड काळात केलेली कामगिरी ही अलीकडील काळातील भारताच्या चांगल्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे. पुढील २५ वर्षांत भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा उपक्रम भारताला अमृत काळात नेण्यासाठीची एका सुरवात आहे.’’
