सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘आक्रोश मोर्चा’
सोलापूर : केंद्रातील भाजप सरकारच्या ‘सुलतानी’ संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने आज (2 ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांच्या नेतृत्वात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भव्य आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
देशातील तरुणांची फसवणूक करणारी अग्निपथ योजना बंद करा, सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा, झोपडपट्टीधारकांना हक्काचे ५०० चौरस फूट घर द्या, इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढते दर कमी करा, मुस्लिम बांधवांना उच्च न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची अंमलबजावणी करा, महार वतनांच्या जमीनी बळकावणाऱ्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमीनी मुक्त करून मुळे मालकांना देण्यासंबधी शासन निर्णय करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
केंद्र तसेच राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पंरतु, गेल्या सात दशकातील सर्वात वाईट हाल या महागाईच्या संकटात गेल्या आठ वर्षांपासून सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहे,असे मत अँड. ताजने उपस्थितांना संबोधित करतांना व्यक्त केले. महागाई, बेरोजगारीने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम बसपा करीत आहे. सामान्य मतदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिवकण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारच्या सुलतानी संकटासह अस्मानी संकटाने सर्वसामान्य शेतकरी हवालदील झाला आहे.अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत घोषित करावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची वीज बील माफ करावी, उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांचे शालेय शुल्क माफ करावे तसेच शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळी प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांनी केली.
यावेळी प्रदेश महासचिव अप्पा साहेब लोकरे, सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव विलास शेरखाने, अजित ठोकळे, संजय वाघमारे, प्रदेश सदस्य बलभीम कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष भालचंद्र कांबळे, शहर अध्यक्ष देवा भाई उघडे,उपाध्यक्ष अशोक ताकतोडे, महासचिव रवी सर्वगोड, कार्यालय सचिव करण काळे, उपाध्यक्ष राहुल सर्वगोड, सचिव प्रवीण कांबळे, शहर सचिव मिणाज शेख, रमेश गायकवाड,मोहमद जकार्ते मोहम्मद शफी इंद्रेकर आदी उपस्थित होते.
