शिवसेना म्हणून मान्यता द्या, शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आमच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली असून निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. तसेच ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत गेले होते. त्यावेळी ते निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांनी ही भेट घेतली नाही. परंतु शिवसेनेच्या १२ खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्यासंदर्भात आणि निवडणूक चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, आज शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे.
आमदारांसह खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे काल (मंगळवार) राज्य निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पत्र देण्यात आलं होतं.
दरम्यान, शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, आता शिंदे गटाकडून दाव्याचं पत्रं आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.