प्लीज, आमचं बालगंधर्व पाडू नका – ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर
बालगंधर्व परिवाराचा ‘जीवन गौरव’ ज्योती चांदेकर यांना प्रदान
पुणे : प्लीज, आमचं बालगंधर्व पाडू नका. आमच्या काळात आम्ही इथे सोन्याचे दिवस पाहिलेत. पण आज अनेकांनी सोशल मिडियामध्ये बालगंधर्वची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले तेव्हा खंत वाटली. की ज्या नाटय मंदिराला आम्ही मंदिर मानतो त्यांचे भग्न अवशेष आम्हाला बघायला लावू नका, अशी आर्त विनवणी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी आज पुणे महापालिकेकडे केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिना निमित्त २५ ते २७ जून दरम्यान ‘बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव 2022’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्योती चांदेकर बोलत होत्या. यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संजय चोरडिया, म.न. पा. उपआयुक्त संतोष वारोळे, वन ओटीटी प्लॅटफॉर्मचे संचालक विनायक सातपुते, चेतन मणियार, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, राष्ट्रसंचारचे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी व सभासद मान्यवर उपस्थित होते.
ज्योती चांदेकर म्हणाल्या, आमच्या नाटकांच्या दौऱ्यांची सुरूवात इथेच व्हायची आणि समारोपही. आम्हाला ही वास्तू पाडू नये असे वाटतं तसच ती सुंदर असावी असही वाटतं. कारण आम्ही येथे रसिकांची करमणूक करायला येतो. पण तीच वास्तू अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम आमच्या सादरीकरणावरही होतो आणि आमच्यावरही होतो. बालगंधर्वांची शान ठेवणे हे आता तुमच्या हातात आहे. आम्हाला पुन्हा तीच शान आणि वैभव येथे अनुभवायला मिळावी, ही अपेक्षाही ज्योती चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिरा विषयीच्या आठवणी सांगताना ज्योती चांदेकर म्हणाल्या, बालगंधर्व ही पुण्याची शान आणि आमच्या कलाकारांचा अभिमान त्यांच्या नावाने 54 वा बालगंधर्व रंगमंदिर महोत्सव सुरू असल्याचा अभिमान वाटतो. माझ्या कारकिर्दीची सुरूवात मी बालगंधर्व येथून केली आहे. बालगंधर्वमध्ये प्रयोग करायचा म्हणजे दडपण असायचं, पण हा मखमली पडदा दूर झाला आणि प्रेक्षकांची दाद मिळाली की सगळ दडपण गुल व्हायचं. आज इथे आल्यावर येथे केलेले सर्व नाटकाचे प्रयोग डोळ्यासमोर उभे राहिले अनेक कटू, गोड आठवणी ताज्या झाल्या. इथे सलग प्रयोग असल्यास थोड्या वेळात पिलेला चहा, बटाटेवडा अगदी सगळं.
यावेळी मानपत्राचे वाचन अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश सुपेकर आणि आभार शोभा कुलकर्णी यांनी मानले.