Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू (बु) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे आतंरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे ) आमदार अशोक पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे,  मुख्यमंत्र्यांचे प्रधानसचिव विकास खारगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात आहेतच. त्यांचे स्मारक देखील मनाचा ठाव घेणारे आकर्षक आणि भव्य असावे. संभाजी महाराजांचे आयुष्य संघर्षमय असे होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वांच्या घटनांचे प्रतिबिंब हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनां सादर केल्या जाव्यात. त्या त्रिमितीय स्वरुपात सादर करण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तरुणांमध्ये ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, स्मारक याबाबत मोठे आकर्षण आहे. अशा  ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक आकर्षक स्मारक झाले पाहिजे तसा आराखडा पुन्हा शिखर समितीसमोर सादर करावा.

महसूल मंत्री  थोरात म्हणाले,  देश-विदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पर्यटकांना देशात आल्यानंतर किंवा राज्यातील पर्यटकांना सुद्धा हमखास या स्मारकास भेट द्यावी असे वाटावे इतके सुंदर, माहितीपूर्ण आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारे हे स्मारक असावे तसा आराखडा तयार करून  नियोजन करावे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री  चव्हाण म्हणाले, स्मारक करताना विविध संकल्पना यामध्ये राबविल्या पाहिजे. बहुपर्यायी असा आराखडा तयार करून स्मारक उभारताना यामध्ये नाविन्यता आणि  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करावा.

सांस्कृतिक कार्य मंत्री  देशमुख म्हणाले, स्मारकांच्या ठिकाणी जयंती व बलिदान दिन या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसेच या भागातील पूररेषेचा अभ्यास करून हा आराखडा तयार करावा असे यावेळी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले. भीमा-भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी स्मारक साकारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली. तुळापूर येथे आठ एकर तर वढू (बु) येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर स्मारक परिसर साकारण्यात येणार आहेत. शिखर समितीपुढे सादर केलेल्या आराखड्यात स्मारक परिसरात भव्य शिल्प, ॲम्फीथिएटर, प्रवेशद्वार, इमारत बांधकाम, घाट बांधकाम, संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश व ध्वनी शो, पायाभूत सुविधांतर्गत पाण्याच्या टाक्या, विद्युतीकरण, सौर ऊर्जा पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, संरक्षक भिंत याबरोबरच अस्तित्वातील समाधीचा जीर्णोद्धार आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

याबैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आदी मान्यवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading