राज्यात केवळ २६.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई : यंदाच्या वर्षी मान्सून लांबणीवर पडला असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवत आहेत. आता राज्यात मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात २ जून २०२२ रोजीच्या आकडेवारीप्रमाणे केवळ २६.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती राज्यासारकारने जाहीर केली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२ जून २०२२ रोजीच्या आकडेवारी नुसार, अमरावती विभागात ३२.३० टक्के, औरंगाबाद विभागात २९.५८ टक्के, कोकण विभागात ३८.४७ टक्के, नागपूर विभागात २८.५४ टक्के, नाशिक विभागात २४.०९ टक्के, पुणे विभागात २०.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यात ४४२ टॅंकर्सने पाणीपुरवठा
राज्यात ३० मे २०२२ च्या स्थितीप्रमाणे ५१५ गावे आणि ११८० वाड्यांना ४४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये कोकण विभागात १८२ गावे आणि ५७२ वाड्यांना १०६ टँकर्सद्वारे, नाशिक विभागात १२६ गावे आणि २३४ वाड्यांना १०५ टँकर्सद्वारे, पुणे विभागात ७५ गावे आणि ३४२ वाड्यांना ८० टँकर्सद्वारे, औरंगाबाद विभागात ५४ गावे आणि ३२ वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे, अमरावती विभागात ७५ गावांना ७५ टँकर्सद्वारे, नागपूर विभागात ३ गावांना ३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
