‘त्रिवेणी’ तून सप्तसुरांची मुक्त उधळण
पुणेः माझे माहेर पंढरी… सखी मंद झाल्या तारका… अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना… रंगना डालो शामजी… ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी अशा विविध रागातील गीतांनी प.विनोदभूषण आल्पे यांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. आणि आपल्या घरंदाज गायिकीतून पुणेकरांवर सप्तसुरांची मुक्त उधळण केली.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने स्वरभास्कर पंडित भिमसेन जोशी व पंडित कुमार गंधर्व यांच्या संयुक्त जन्मशताब्दीनिमित्त सांगितिक मानवंदना देण्यात आली. यावेळी त्रिवेणीकार पं. विनोदभूषण आल्पे यांनी गायनाबरोबरच पं. भिमसेन जोशी व पं. कुमार गंधर्व यांच्या सहवासातील रंजक किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी शरदचंद्र पाटणकर, उपेंद्र भट, डॉ. रुपाली चौधरी (कारावा), पं. सुरेश साखवळकर, अविनाश निमसे, विवेक जडे, जितेंद्र बाराथे आदी उपस्थित होते. माधव मोडक (तबला) दिप्ती कुलकर्णी (हार्मोनियम) रविंद्र देवधर (संवादक) वसंत देव (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.
कुमार गंधर्व यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देताना प. विनोदभूषण आल्पे म्हणाले, कुमारजी हे अद्भूत असे चरित्र होते. पंडितजींबरोबर साथीला बसताना तंबो-याचा एक स्ट्रोक जरी चुकला तरी त्यांना लगेच कळत असे. तंबोरा हा त्यांच्यासाठी कॅनव्हास होता आणि त्यावर ते सुरांचे चित्र रेखाटत असे, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या गायकीची अनेक वैशिष्ट्ये देखील रसिकांसमोर उलगडली.