पुण्यात पुरुष व महिला बाउन्सरचे पोलीस वेरिफिकेशन झाले पाहिजे – संभाजी ब्रिगेड
पुणे : शहरातील क्लाईन मेमोरियल, बिबवेवाडी शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिक्षण आयुक्त यांच्याकडे संभाजी ब्रिगेडने केली आहे.
आयुक्त शिक्षण आयुक्त मांढरे व प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सचिव संदीप कारेकर, कार्याध्यक्ष नितीन वाघिरे, अजय माने, नरेश पडवळ, अनिल भुजबळ आदी उपस्थित होते.
पुण्यातील बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पुरुष व महिला बाउंसर ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही शाळेने या बांऊसरची चारित्र्य पडताळणी केलेली नाही. तसेच कोणत्याही बाउन्सर ची अधिकृत नोंदणीकृत संस्था नाही. सर्व खाजगी पद्धतीने शाळेमध्ये बाउंसर आणून पालकांवर दबाव टाकण्याचा या शाळा सर्रास प्रयत्न करत आहेत. कुठल्याही खाजगी सुरक्षा रक्षक किंवा बाऊंसर ठेवायचा असेल तर त्यांचं पोलीस चारित्र्य पडताळणी (Police verification) असणे आवश्यक आहे. मात्र पुण्यात सर्रास शाळांमध्ये असणारे बाउंसर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे असण्याची शक्यता आहे. कारण बांऊसरला हातात काठी घेण्याची परवानगी नसताना पालकांना मारहाण झाली हे निषेधार्ह आहे.
क्लाईन मेमोरियल शाळेतील संस्थेने मारहाण केल्याच्या दोन दिवस अगोदर पालकांवर दबाव टाकण्यासाठी बाउंसर ची नियुक्ती करण्यात आली होती. या व अशा बाउन्सर ची कुठलीही चारित्र्य पडताळणी झालेली नाही. तसेच त्यांच्या अधिकृत संस्थेला पोलिसांची परवानगी आहे का हेही तपास तपासले पाहिजे. कारण पुण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे बाउंसर सध्या दहशत माजवत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. राज्य सरकार व शिक्षण विभागाने यावर गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बाऊन्सर ची संस्था यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी आणि जर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या सर्व गोष्टींमध्ये पुणे पोलिसांचा सर्वात मोठी भूमिका असताना पोलिसांनी बाऊन्सर कडून पालकाला झालेल्या मारहाणीत चुकीचा तपास केला असून त्यांचा अहवालावर अक्षेप आहे. या सर्व गोष्टी संशयास्पद असल्याचे निदर्शनास येते. म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि बेकायदेशीर शाळांवर कायदेशीर कडक कारवाई करून त्यांच्या परवानग्या रद्द केल्या पाहिजेत. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 28 मार्च 2022 रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.