पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांना पक्के, मालकी हक्काचे घर – डॉ. सुजय विखे पाटील
अहमदनगर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान आवास योजनेद्वारे आर्थिक मागास व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबानाही चांगली घरे मिळत आहेत. सरकार, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्रित येऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये उभारलेला हा प्रकल्प आदर्शवत आहे. वस्तीत राहणाऱ्या या कुटुंबाना हक्काचे घर मिळावे म्हणून स्नेहालय संस्थेने पुढाकार घेऊन कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या मदतीने हा प्रकल्प उभारला,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
कम्युनिटी डिझाईन एजन्सी (करी स्टोन फाउंडेशन), स्नेहालय आणि अहमदनगर महापालिका यांच्या पुढाकारातून संजयनगर, काटवण खंडोबा मंदिर येथील झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेत पक्की घरे आज सुपूर्द करण्यात आली. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातील संजयनगर भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा आज आपल्या नवीन घरात ‘गृहप्रवेश’ झाला. येथील ३३ कुटुंबीयांची आपल्या हक्काच्या पक्क्या घराची ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे.
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीनाचोपडा, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, विद्या खैरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पाठारे, शाखा अभियंता गणेश गाडळकर, कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या नायडू जनार्धन, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, गिरीश कुलकर्णी, संजय बंदिष्टी आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “बारीकसारीक गोष्टींची काळजी यामध्ये घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून जास्तीतजास्त निधी आणून असे प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील एकही कुटुंबाचा निधी प्रलंबित राहू देणार नाही. तसेच या प्रकल्पातील सदनिकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून देईल. पक्षविरहित, राजकारणविरहित विकासकामे झाली, तर देशाची प्रगती अतिशय वेगाने होईल. विकासकामांच्या बाबतीत आपण सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. कारण पैसे, पद यापेक्षा गरिबांचे आशीर्वाद अधिक महत्वाचे आहेत.
