जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत हे सरकार चालणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: भाजपकडून सरकार पडणार असल्याच्या दाव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांच्या सरकार टिकत नाही या वक्तव्याबद्दल मला काही बोलायचं आहे. जोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या मागे आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.सरकार स्थापन झाल्यापासून अशा तारखा दिल्या जातायत. पण सरकारला सव्वा दोन वर्ष झालीत. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत हे सरकार चालणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात तळजाई येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्याकरिता आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
नवाब मलिक प्रकरणावरून राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, नवाब मलिक यांचं प्रकरण 1991 चे आहे. एक पक्ष सोडून इतरांवरच कारवाई होते याचा बोध जनतेने घ्यावा, असं पवार म्हणाले. राजकीय आरोप करताना दोन्ही बाजूने तारतम्य बाळगण्याची गरज आहे. आपली ही संस्कृती नाही, आपली ही परंपरा नाही, असंही ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. मराठी भाषा भवन उभारण्यासाठी प्रयत्न होतोय. मराठी पाट्या लावायला काय अडचण आहे. भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे असंही पवार म्हणाले.
युक्रेन आणि रशियामध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे.
त्यामुळे काही भारतीय विद्यार्थी तीथे अडकले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, जगात सध्या तिसरं महायुद्ध होतंय का अशी परिस्थिती आहे. हे थांबलं पाहिजे. मंञी देसाई पण त्यासाठी दिल्लीला गेलते. तिकडं वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेली सर्व मुलं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.आज आपली दिल्लीत 32 मुलं येताहेत, असे अजित पवार म्हणाले.