शिवजयंतीला सलग १० व्या वर्षी शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून दिली जाणार मानवंदना
पुणे : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत सालाबाद प्रमाणे निघणारी मिरवणूक रद्द करुन शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीला शनिवार, दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. स्वराज्यघराण्यांच्या हस्ते मिरवणुकीच्या ऐवजी प्रथेपरंपरे प्रमाणे शनिवारी सकाळी ९ वाजता लालमहाल येथील लालमहालातील जिजाऊ मॅांसाहेब व शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालुन, जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलित करुन लालमहाल ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रागंणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापर्यंत वाटचाल करित शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
सोहळ्याचे यंदा १० वे वर्ष आहे. शिवकालीन ऐतिहासिक स्वराज्यघराणी, सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल १०० स्वराज्यरथांचा सहभाग असणारा हा विश्वातील एकमेव “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” आहे. परंतु शासनाने दिलेल्या निर्देशाचा सन्मान राखत यावेळेस मिरवणुक न काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
सोहळ्याचे आयोजन समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पायगुडे, रवींद्र कंक, संजुभाऊ पासलकर, दीपक घुले, नीलेश जेधे, शंकर कडू, समीर जाधवराव, किरण देसाई, गोपी पवार, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे.
शिवजयंतीला, शिवाजी नगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर शनिवारी सकाळी ११ वाजता, सलग ११ व्या वर्षी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन ईशान अमित गायकवाड मानवंदना देणार आहे.
