चंद्रकांतदादा फडणवीसांवर कारवाई करणार हा आम्हाला विश्वास – प्रदिप देशमुख
पुणे : केंद्र सरकारने पाठविलेल्या श्रमिक रेल्वेगाड्या महाराष्ट्र सरकारने रिकाम्या पाठवायला पाहिजे होत्या हे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे विधान अतिशय महत्वाचे असून त्यांनी आता त्या काळात या गाड्या आणण्यासाठी मदत करणाऱ्या भाजपा नेत्यांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्राने पाठविलेल्या रेल्वेगाड्या महाराष्ट्राने रिकाम्या पाठवायला पाहिजे होत्या असे म्हटले आहे. चंद्रकांतदादा हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचे हृदय असणाऱ्या कोथरुडमधून निवडून येतात. त्यामुळे त्यांची विधाने हे पुर्ण विचारांती केलेली असतात अशी आमची धारणा आहे असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले की, ” ९ मे २०२० रोजी दुपारी ४.३३ वाजता ट्वीटर या समाजमाध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील ट्वीट केला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईतून १० गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यांची ही कृती चंद्रकांतदादांच्या या विधानामुळे निश्चितच पक्षद्रोह असल्याचे अधिरेखित झाले आहे. जर चंद्रकांतदादांना ती कारवाई करणे अवघड वाटत असेल तर पक्षनेतृत्वाशी असलेल्या घनिष्ट संबंध पाहता ते लवकरच फडणवीस, गोयल आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करायला पक्षाला भाग पाडतील असा आम्हाला विश्वास आहे.
