येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता
पुणे:गेल्या आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणांना जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. कालही पुण्यासह घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अचानक पाऊस पडल्यानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे. पुढील आणखी दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज पुणे, नाशिक, अहमदनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनचं याठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात आज दिवसभर ऊन गायब असल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
