कृषी कायदे मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आनंदोत्सव
पुणे : केंद्रात सत्तेत असणाऱ्या क्रूर मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी बांधवांनी उभारलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजय आज झाला. शेतकऱ्यांना गुलामगिरीत ढकलणारे काळे कायदे करणाऱ्या मोदी सरकारला मागे घ्यावेच लागले. या विजयाचा जल्लोष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बोलतांना शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप म्हणाले की,” कायदे तर रद्द झाले परंतु इतके दिवस शेतकऱ्यांचे हाल करून मोदी सरकारने काय मिळवलं हा प्रश्न कायम विचारला जाईल. आज कायदे मागे घेता येतील, परंतू या अन्यायाच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या शेकडो शेतकरी बांधवांचे प्राण पुन्हा येतील का? एका हुकूमशहाच्या वेगवेगळ्या हट्टापायी आपण देशाचं किती नुकसान करत आहोत याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे.”
यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. “जय जवान जय किसान” , “शेतकरी एकजुटीचा विजय असो” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, बाळासाहेब बोडके, निलेश निकम, मृणालिनी वाणी, शुभम माताले, महेश हांडे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.