येणाऱ्या काळात ‘जनशक्ती’च्या माध्यमातून पाण्यासाठी लढा उभा करणार -अतुल खूपसे पाटील
करमाळा’: उजनी धरण उशाला आणि कोरड मात्र घशाला’ अशी परिस्थिती सावडी येथील शेतकऱ्यांची झाली आहे. आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी व आमदार महोदयांनी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण केले. मात्र या शेतकऱ्यांकडे कधी आपुलकीने पाहिलेच नाही. उजनी धरणापासून सावडी गाव अवघे दहा बारा किलोमीटरवर आहे. गावाच्या दोन्ही बाजूने कुकडी योजनेचा कॅनल गेला आहे. तरीही गावाला पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाळ्यामध्ये या पाण्यासाठी माय भगिनींना दाहीदिशा भटकंती करावी लागते. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘जनशक्ती’च्या माध्यमातून पाण्यासाठी लढा उभा करणार असल्याचे प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केले.
सावडी (ता. करमाळा) येथे जनशक्ती शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शरद एकाड पाटील,
अतुल भोसले, दिलीप देशमुख, देविदास तळेकर, अजीज सय्यद, बाश्याभाई शेख, नितीन तळेकर, बालाजी शेलार, महादेव शेलार, साहिल शेख, हनुमंत तळेकर, शंकर तळेकर, श्रीराम तळेकर, शकील शेख, इम्रान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कधीच पोहोचल्या जात नाहीत. त्यासाठी आपण डोळे उघडून शासकीय योजनेचा लाभ घेतला पाहिजे. शासकीय अधिकारी व कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत. एखादा कामचुकार व दलाल असू शकतो मात्र शासकीय सेवेत 90 टक्के कर्मचारी व अधिकारी प्रामाणिक आहेत. त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड, घरकुल, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अंध अपंग विधवा या वंचित घटकांच्या योजना व त्याचा लाभ गरजूंनी घेतला पाहिजे. हा लाभ घेताना कुठे अडचण आली तर जनशक्ती संघटनेचा कार्यकर्ता तुमच्यासाठी धावून येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शाखेचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी साहेबराव विटकर, इस्लाम सय्यद, विशाल शेलार, इम्रान शेख, अनिकेत देशमुख, अक्षय शिंदे, राणा वाघमारे, कल्याण गवळी, रोहन नाईक नवरे व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.