राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे : अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
राज्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल महाराष्ट्राच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने पुणेकरांना जोडपले. तसेच इतर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. समुद्र किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र दूर सरकल्य़ाने कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव जाणवला नाही. मात्र पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र राज्याच्या किनारपट्टी भागाकडे सरकल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.