गळीत हंगाम व वाहतूक संप यामुळे ऊस वाहतूकदार सापडले कात्रीत
करमाळा :राज्यासह जिल्ह्यातील कारखानदारांची गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याची लगबग सुरू आहे. एकीकडे बॉयलर अग्नी प्रतीपदन व मोळी पूजन समारंभ मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात सुरू आहेत. मात्र दुसरीकडे ऊस वाहतूकदारांनी वाहतूक बंद आंदोलन करून संप पुकारला आहे.
डिझेलच्या वाढत्या दरामुळे ऊस वाहतूक करणे सध्या तोट्यात आहे. मात्र वाहन बसून कसे ठेवायचे ? त्यामुळे काहीतरी पदरात पडेल या अपेक्षेने शेतीला जोडधंदा म्हणून ऊस वाहतूक केली जाते. मात्र कारखानदारांना याबद्दल कोणतेच सोयरसुतक नाही. चार पैसे वाढवून मिळावी इतकीच मागणी ऊस वाहतूकदारांची असताना कारखानदार या मागणीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असून जनशक्ती संघटनेने पुकारलेला संप आणि कारखानदारांची गळीत हंगाम सुरू करण्याची लगबग पाहता ऊस वाहतूकदार मात्र अडचणीच्या कात्रीत सापडला आहे.
अशा अनेक अडचणी कारखानदारांनी सोडवाव्या म्हणून जनशक्ती संघटनेने प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलने केली. यासंदर्भात साखर आयुक्तांनी बैठक बोलावली. मात्र इथेही तोडगा निघाला नाही. साखर आयुक्त यांनी कायद्याकडे बोट दाखवत ऊस वाहतूक दारान संदर्भात कोणताच कायदा नसल्याचे सांगून मी फक्त कारखानदारांना ऊस वाहतूक दर वाढवून द्या इतकीच विनंती करू शकतो असे सांगितले. दरम्यान साखर आयुक्तांनीयासंदर्भात कारखानदारांना कोणतीच विनंती केली नसल्याचे सांगण्यात येते.
