ज्येष्ठांच्या सन्मानातून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य – अभिनेते रझा मुराद
पुणे : सूर्यदत्ता संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल वेल्फेअर ट्रस्टतर्फे ‘आदर्श माता-पिता पुरस्कार’ चंचला व मोतीलाल सुराणा यांना, तर सुशिलाबाई बंब यांना समाजरत्न पुरस्कार, डॉ. अशोककुमार पगारिया यांना समाज शिरोमणी पुरस्कार, महावीर नहार यांना समाजभूषण पुरस्कार व डॉ. रसिक सेठिया यांना मानवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संस्कार भारती, वाणीभूषण परमपूज्य प्रीतिसुधाजी महाराज, स्वरसम्राज्ञी परमपूज्य मधुस्मिता जी महाराज व अन्य साध्वी महाराज साहेबांच्या उपस्थितीत, भजनसाम्राट अनुप जलोटा, अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. वडगावशेरी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ येथे झालेल्या या पुरस्कार व गौरव सोहळ्याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, रोशनी जैन
रोहित संचेती, नयना गोडांबे, अभिश्री मोर, बटू पाटील, सोनाली ससार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व साधुसंताना सन्मानित करण्यात आले.
रजा मुराद म्हणाले, ”मुलांना शिक्षण देऊन त्यांचे भविष्य घडवणे हे पुण्याचे काम आहे. शिक्षणाबरोबरच जेष्ठांचा सन्मान करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य सुषमा व संजय चोरडिया करीत आहेत. खूप मेहनत, काबाडकष्ट करून आई-वडील मुलांना शिक्षण आणि चांगले आयुष्य देण्यासाठी झटतात. त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा विसर पडता कामा नये. संपूर्ण जगात भारत एक असा देश आहे, जिथे जेष्ठांच्या पाया पडले जाते. ज्येष्ठांच्या आशीर्वादाची शक्ती मोठी असते. माझी आणि चोरडियांची मैत्री याच प्रेमाचे प्रतीक आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अभ्यास, मेहनत, व्यायाम, आई-वडिलांचा, जेष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. आज साध्वी महाराजांच्या सानिध्यात असा कार्यक्रम होताना आणि या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करताना अतिशय आनंद होत आहे.”
