महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांच्या मदतीने दोन रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू
पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसीस करण्यासाठी पाच हजारापर्यंत खर्च येतो, हा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना परवडत नसल्याने महापालिकेतर्फे सामाजिक संस्थांच्या मदतीने दोन रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. त्यात आत्तापर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता आणखी दोन ठिकाणी ४०० रुपयात डायलिसिस केंद्र सुरू केले जाणार आहेत.
मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे खावी लागतात. सतत गोळ्या, औषधे खाऊन त्याचा परिणाम किडनीवर होऊन तिची क्रिया मंदावते, काही जणांची किडनी तर पूर्णपणे काम करत नाही. त्यामुळे रक्तातील घातक घटक वाढल्याने जिवाला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी रुग्णांना डायलिसिसची करणे आवश्यक असते. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ हजारांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते.
किडनीचे काम योग्य पद्धतीने जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत ठरावीक दिवसांनी डायलिसीस करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे यावर वारंवार होणारा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना परवडणारा नसतो. अशा नागरिकांसाठी महापालिकेने पाच वर्षापूर्वी कमला नेहरू रुग्णालयात रोटरी क्लबच्या मदतीने पहिले डायलिसीस केंद्र सुरू केले. त्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात ही सुविधा अल्पदरात उपलब्ध करून दिली. पुणे शहराच्या सर्वच भागात डायलिसीस केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात असल्याने त्यात आता आणखी दोन केंद्रांची भर पडणार आहे. यामध्ये आंबेगाव बुद्रूक येथील रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वारजे येथील बारटक्के रुग्णालयात प्रत्येकी १० बेडचे डायलिसीस सुरू केले जाणार आहे.
कमला नेहरू व राजीव गांधी रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसीस केंद्र सुरू असून, एका दिवसात दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० नागरिकांचे डायलिसीस केले जाते. या दोन्ही ठिकाणी मिळून आत्तापर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांचे डायलिसीस झाले आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या नागरिकांना ४०० रुपयात ही सुविधा मिळत आहे. त्याच प्रमाणे शहरी गरीब योजनेतून डायलाइट ट्यूबींग आणि रक्तवाढीचे इंजेक्शन दिले जात असताना त्याखर्चातही बचत होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख