तळजाई टेकडीवरची नैसर्गिक जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार – वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : तळजाई टेकडीशी फार जवळचा स्नेह असल्यामुळे तेथील जैवविविधतेशी परिचीत असून येथील समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होउ देणार नसल्याची ग्वाही वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्प राबविला गेला तर याठिकाणी बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार, अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार हे उघड असल्याने या ठिकाणी या प्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे येथील होणारा –हास थांबविण्यासाठीचे निवेदन वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पर्यावरणप्रेमींतर्फे देण्यात आले.
राज्याचे वनराज्यमंत्री म्हणून हे प्रकल्प रद्द करावेत तसेच येथील निसर्ग संवर्धणाकरिता वेगवेगळे उपक्रम राबवावेत, पुण्यातील ऑक्सिजन म्हणजेच तळजाई टेकटी वाचवावी अशी विनंती या निवेदनाद्वारे पर्यावरणप्रेमी संस्था माय अर्थ फांउडेशनच्या वतीने वनराज्यमंत्री भरणे यांना केली.
यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, श्रीकांत मेमाणे, इन्वार्मेंट क्लब ऑफ इंडीयाचे ललित राठी, विजय जोरी आणि विजय चोरगे उपस्थित होते.
पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीवर ११० एकर जागेत विकासाच्या नावावर तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तळजाई टेकडी नष्ट झाली, तर कालांतराने शहराचा श्वास गुदमरेल. सामान्य जनता, पर्यावरणप्रेमी आणि तिथेच फिरायला येणाऱ्या नागरिकांचाही या कृत्रिम प्रकल्पाला विरोध आहे. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावणप्रेमींना वाटत आहे.