२० मार्च व्हेंचर्स या संस्थेला आर्थिक सहाय्य मिळावे
खासदार गिरीश बापट यांचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांना निवेदन
पुणे : केंद्र सरकारच्या सामाजिक धोरणानुसार उभारलेल्या मे. २० मार्च व्हेंचर्स या आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंपनीला केंद्र सरकार कडून अर्थ सहाय्य मिळावे यासाठी आज खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांना निवेदन दिले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, नगरसेवक धीरज घाटे, कंपनीचे संस्थापक संचालक अविचल धिवार, तसेच भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड चवदार तळ्याच्या लढ्याने सामाजिक समतेची चळवळ गतिमान केली. त्यामुळे देशभर २० मार्च हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पाणी हा विषय असल्याने “20th MARCH” या नावाने बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे उत्पादन सुरू केले. २६ जानेवारी २०१७ पासून हे बाटलीबंद पाणी पुण्यात उपलब्ध झाले. या उपक्रमातून सुमारे २५० व्यक्तींना रोजगार प्राप्त झाला.
या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपये खर्च आला आहे. यापैकी ४.५५ कोटी रुपये केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शडूल्ड कास्ट’ या योजनेतून फंड मॅनेजर कॅपिटल लिमिटेड मार्फत कर्ज स्वरूपात घेण्यात आले. उर्वरित ३.५० कोटी रुपयांचे भागभांडवल कंपनीच्या अनुसूचित जातीच्या ५८ सदस्यांनी जमा केले. भरभराटीस असलेला हा उद्योग दुष्काळ आणि कोरोना महामारीमुळे २०१९ पासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.संस्थेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाकडे तसेच आयएफसीआय नवी दिल्ली यांच्याकडे अर्थसाह्य पुनर्रचना आणि अतिरिक्त अर्थसहाय्य मिळण्या बाबत प्रस्ताव दिला आहे. अनेक पाठपुराव्या नंतर ही या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नाही. कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आत्मनिर्भर योजनेतून सर्व बँकांनी अडचणीत असलेल्या लघुउद्योगांना सहकार्य केले. मात्र आयएफसीआय व्हेंचर कॅपिटल फायनान्स लिमिटेड या कंपनीने आरबीआयचे आत्मनिर्भर योजना आम्हाला लागू नाही तसेच सामाजिक न्याय विभागाचे मार्गदर्शक सूचना नसल्याचे कारण पुढे करत कोणत्याही अनुसुचित जातीच्या उद्योगासाठी अर्थसहाय्य मंजूर केलेले नाही.
