उद्या दक्षिण कोकणासह घाट परिसर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
पुणे:गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर उद्या पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं उद्या दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीनं चक्रीवादळ तीव्र झालं असून त्यानं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळ किनापट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. येथील मस्कटसह अनेक शहरं जलमय झाली असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहनं पाण्यात बुडाली असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम असून अनेक शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
हे संकट कमी होतं म्हणून की काय केरळजवळ अरबी समुद्रात एक नवीन संकट उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टी सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे बिहार आणि उत्तर प्रदेश परिसरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा पूर्वेकडे फिरण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
