Pune Metro – तत्कालीन काँग्रेस खासदार कलमाडींनी रचिला पाया, आघाडी सरकार झाले कळस – गोपाळदादा तिवारी
पुणे : पुण्यात काल मेट्रोची ट्रायल यशस्वी झाली. त्यानंतर ज्यांचा या प्रकल्पाशी फार संबंध नाही, किंबहुना ज्यांनी या प्रकल्पात होता होईल तो अडथळेच आणले, अशा भारतीय जनता पक्षाला आपल्या स्वप्नपूर्तीच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. वास्तविक तत्कालीन काँग्रेस खासदार मा सुरेश भाई कलमाडी यांनीच ‘पुणे मेट्रो’ची मूळ संकल्पना मांडली, आणि त्यासाठी मोठी यातायात करून ‘यूपीए सरकारच्या काळात’ त्यास मंजुरी ही आणली…! आणि आता ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकारने’नेटाने हे काम मार्गी लावत, त्यावर कळस चढवला आहे. त्यामुळे ‘पुणे मेट्रो’ही कॉँग्रेसचीच यशोगाथा आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ‘युपीए सरकारच्या काळातच’ पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती…! स्व राजीव गांधी पुतळा अनावरण प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण यांनी तीसऱ्यांदा मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याची जाहीर मागणी देखील आपल्याच कार्यक्रमात केली असल्याचे स्मरण देखील गोपाळ तिवारी यांनी दीले.. पण मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आकसाने पुणे मेट्रो मागे ठेवून, परवानगी नसलेली ‘नागपूर मेट्रो’ पुढे केली त्यामुळे पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाला ३।। ते ४ वर्षे विलंब झाला… त्यातून या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटी रुपयांनी वाढला देखील…! त्यानंतर आजही मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जो निधी देणे अपेक्षित आहे त्यात त्यांनी पन्नास टक्के कपात केली आहे… ! हे अडथळे असतानाही राज्यातल्या आघाडी सरकारने या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सर्वंकष प्रयत्न केल्यामुळे या प्रकल्पावर कळस चढवला गेला आणि मेट्रोची पहिली स्वप्नवत ट्रायल रन प्रत्यक्षात उतरली.
काँग्रेसच्या या यशोगाथेची पुणेकरांना पूर्ण कल्पना आहे. वास्तविक कलमाडी यांच्या काळात जेव्हा ‘पुणे मेट्रोची’ कल्पना मांडली गेली, त्यावेळी ‘मध्य पुण्यात’ हा प्रकल्प अशक्य असल्याची बोंब ठोकून, त्यात भाजपच्या काही महाभागांनीच अडथळेच आणले होते. पुण्यात या मेट्रो प्रकल्पाला विरोध करणारा नागरिकांचा एक गट कार्यरत झाला होता, त्यालाही भाजपचा काहीजणांनी समर्थन दिले होते हा इतिहास विसरता येणार नाही त्यामुळे नाहक श्रेय घेऊन या पक्षाने स्वतःचे हसे करून घेऊ नये असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
