पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : आधीच पावसाने कोकणात हाहाकार माजवलेला असताना आता पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 30 आणि 31 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याची तीव्रता पुढील 24 तासात आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रती तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मध्य महाराष्ट्रातल्या घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता.
