संपत्तीचा नव्हे तर मुलांना ध्यान आणि दानचा वारसा द्या- डॉ. सत्येंद्र शुक्ला (लामा)
पुणे : लोककल्याण करण्यासाठी प्रथम स्वतःला त्या योग्य बनवणे महत्त्वाचे आहे. शिष्यांना दिल्या जाणारे ज्ञान, आचरण, नियम व अटी सर्वप्रथम गुरुंनी आत्मसात केलेले असावे. स्वतःची ओळख आपल्या आचार, विचार आणि जीवनातून जगाला करून दिली तरच आपल्या जीवनाची प्रेरणा घेऊन असंख्य जन त्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करतील. भगवान बुद्धांनी पंचवीसशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या लामा फेरा हिलिंग प्रक्रियेला आजही लोक मानतात. भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसा धर्माचे पालन आपण आजही करतो, येशू ख्रिस्त, गुरू नानक साहेब, थोर ऋषी मुनी, संतांची परंपरा आपल्या देशाला लाभली. अशा थोर गुरूपरंपरेचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले हे सत्कर्माचे फळ म्हणायला हरकत नाही. आपल्या मुलांना, भावी पिढीला एक वेळी संपत्ती सोडून नाही गेलात तरी चालेल पण योग्य संस्कार, दानशूर पणा व जीवनात ध्यान करण्याचा वारसा देऊन जा! असा गुरूमंत्र या वेळी डॉ. शुक्ला यांनी दिला.
गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने डॉ. सत्येंद्र शुक्ला द्वारे निर्मित भारतातील सर्वात मोठ्या लामा फेरा मोनेस्ट्री मध्ये ‘महाबोधी ध्यान’ सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जीवनात गुरूंचे महत्त्व आणि स्थान या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. या वेळी अंतरराष्ट्रीय लामा फेरा हिलिंग ऑण्ड ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, लामाज, शिष्य व अनुयायी उपस्थित होते.