मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट
- पुणे, सातारा, कोल्हापूर येथे मुसळधार पावसाची शक्यता
- कोकण घाट माथ्यावर (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टी होण्याचा अंदाज
- विदर्भात विजांसह पाऊस पडण्यात अंदाज
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच पुढील २४ तासांसाठी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे टेंशनमध्ये वाढलंय. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर येथेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय येत्या 24 ते 36 तासात कोकण घाट माथ्यावर (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचे पश्चिमकडील भाग त्याच्या नियमित स्थितीवर असून तो उत्तरेकडे सरकणार आहे. तर पुर्वभाग काहीसा उत्तरेकडे असून, दोन दिवसांत तो उत्तरेकडे येणार आहे. यातच बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र असणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून, तो पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पाऊस पडण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्यासाठी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील अनेक भागात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो.
