मानाच्या पालखी प्रस्थानासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवारी (१९ जुलै) राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व सुसह्य व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 20 शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत.
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपुरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.
सोमवारी या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत. या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होईल. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जातील. वारकरी संप्रदायांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी शिवशाहीचे चालक योग्य ती खबरदारी घेतील, असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.