ठाणे, रत्नागिरी आणि नाशिक मध्येही कारागृह टुरिझम सुरू करण्याचा प्रस्ताव – सुनील रामानंद
पुणे: राज्यातील ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकमध्येही कारागृह टुरिझम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुलांना इतिहास समजावा या उद्देशानं कारागृह टुरिझममागचा हेतू आहे. मुंबईत आणखी एक कारागृह बांधलं जाणार आहे. त्याठिकाणी कच्चे कैदी ठेवले जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्तावही देण्यात आलाय. हिंगोली, पालघर आणि गोंदियातही नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलाय. कारागृह भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव सरकारला दिला गेला. कारागृह कॅन्टीनमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ आता मिळणार आहेत. कैद्यांना ते विकत घेता येणार
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी आज पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
कोरोना संकटाच्या काळात कारागृह विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत कोर्टाने समाधान व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील 60 कारागृहात क्षमतेपेक्षा 152 टक्के जास्त कैदी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 हजार 115 कैदी कोर्टाच्या आदेशानं सोडले. कोरोना काळात 9 कारागृहात लॉकडाऊन पाळल्याचंही रामानंद यांनी सांगितलं.
राज्यात कारागृहातही कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. आज आपल्याकडे 52 कोविड सेंटर उभारण्यात आले. आजच्या तारखेपर्यंत कारागृहात कोरोनाचे 73 सक्रीय रुग्ण आहेत. तर 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यातील कारागृहात 87 हजार कोविड टेस्ट केल्याचंही रामानंद यांनी सांगितलं. तसंच 23 हजार 424 कैद्यांना आतापर्यंत कोरोना लस देण्यात आली. तर 3 हजार 660 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेल्याचं त्यांनी सांगितलं. 60 वर्षापेक्षा जास्त वय अशलेल्या कैद्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे कैद्यांना भेटणं बंद केलं आहे. मात्र, मोबाईलच्या माध्यमातून मुलाखती सुरु आहेत. इतकंच नाही तर 53 कैदी असे आहेत जे पेरोल बाहेर जाण्यास तयार नाहीत. कारण कोरोनाकाळात कारागृहात जी काळजी घेतली जाते ती बाहेर घेतली जाणार नसल्यामुळे कारागृहाबाहेर जाण्यास हे कैदी नकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
संसर्गजन्य आजार कायदा जोपर्यंत लागू आहे तोवर बाहेर सोडण्यात आलेल्या कैद्यांना बोलावलं जाणार नाही. एकूण 4 हजार 342 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 4 हजार 157 कैदी बरे झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर येरवडा परिसरात 5 हजार क्षमतेचं दुसरं कारागृह तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचंही रामानंद म्हणाले.