संभाजीराजेंचा एल्गार, मराठा आरक्षणासाठी येत्या 16 जूनला मुक आंदोलन
कोल्हापूर : आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधीनी बोलायला हवं. आपली व्हॉट बँक बाजूला जाईल म्हणून कुणी बोलत नाही. त्यामुळे येत्या 16 जून रोजी कोल्हापूर येथून पहिला मुकमोर्चा काढण्यात येईल. यावेळी लोकप्रतिनिधीनी मराठा आरक्षणासाठी कोणती जबाबदारी घेणार हे स्पष्ट कराव, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा स्पष्ट केली. कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड यांसह तब्बल 36 जिल्ह्यात आंदोलन केले जाईल.
संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांशी संबध चांगले आहेत. पण माझ्या मराठा समाजासाठी काय करता ते मला सांगा. मी समाजाची दिशाभूल करणारा नाही.
मुंबईत मी पाच मुद्दे मांडून भूमिका सांगितली पण कुणी किंमत दिली नाही. आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. मात्र आता एकमेकांच्या चुका दाखवू नका आपली स्पष्ट भूमिका मांडा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली. तसेच येत्या 12 तारखेला कोपर्डीला जाणार काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले जाणार.
पुनर्विचार याचिका दाखल करा
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांकडे बोट करत आहेत. आपल्याला आता कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने पहिल्यांदा पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. कलम 338 बी मधून पुन्हा मराठा समाजाला मागास असल्याचे सिद्ध केले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
पुणे ते मंत्रालय लॉंग मार्च
आमच्या हक्कांसाठी आम्ही नेहमी आग्रही राहणार, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. येत्या काळात मराठा आरक्षणासाठी पुणे ते मंत्रायलापर्यंत लॉंग मार्च काढला जाईल. असेही संभाजी राजे यावेळी म्हणाले. या मोर्चासाठी सर्व आमदार, खासदार यांचा सन्मान ठेऊन बोलवू.
