अभिजात साहित्यकृती तत्कालीन मराठीत भाषांतरीत व्हाव्यात – डॉ. सदानंद मोरे
पुणेः- ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये असल्याने सर्वमान्यांना ती कळत नव्हती, म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ती तत्कालीन प्रचलीत सोप्या मराठी भाषेत भाषांतरीत केली. पंरतू आजच्या पिढीला ती मराठी भाषा देखील समजायला जड जाते. भाषा प्रवाही असल्याने तिचे स्वरुप हे बदलते असते. हा बदल लक्षात घेऊन त्या त्या काळातील साहित्यिकांनी तत्कालीन प्रचलित भाषेत अभिजात साहित्यकृती भाषांतरीत करुन हा साहित्यरुपी ठेवा पुढील पिढीकडे सुपूर्त करवा, अशी अपेक्षा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा ‘काव्यप्रतिभा’ पुरस्कार यंदा प्रख्यात अर्थतज्ज्ञ, लेखक, कवी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील संचालक डॉ. आशुतोष रारावीकर आणि आयुर्वेद स्वास्थ्य सल्लागार कवयित्री डॉ. ज्योती रहाळकर यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरून डॉ. मोरे बोलत होते.
सन्मानपत्र, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, मैथिली आडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले, जीवनाचे सुक्त आणि सुत्र काव्यात सापडते. आपल्या रोजच्या जगण्यातील अनुभवांना शब्दपुुष्प लाभल्यास त्या शब्दांचे मोती होतात. काव्य हा तसा साहित्यातील लोकांच्या अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. कमीत कमी शब्दांत काव्यत्मक पद्धतीने केलेला उपदेश लोकांच्या थेट मनापर्यंत पोहोचतो.
पुरस्कार्थी डॉ. आशुतोष रारावीकर त्यांच्या मनोगतात म्हणाले, लेखक या नात्याने सरस्वतीच्या सेवेची मिळालेली संधी हे माझे मोठे भाग्य असून हा पुरस्कार रुपी प्रसाद मी अंतःकरणपूर्वक स्विकारात आहे. अर्थशास्त्र आणि साहित्य हे दोन्ही जीवनाची अर्थपूर्णता वाढवतात. काव्य हे माणसाला अमरत्वाकडे नेते. ‘यश पुष्प’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तका मागील भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.