सुसंस्कृत पिढीसाठी बालकांच्या मनावर वाचन संस्कार आवश्यक – राजीव बर्वे
पुणेः- आमच्या लहानपणी पुस्तके वाचा असे सांगावे लागायचे नाही. पुस्तके अाजू-बाजूला असायचीच आणि आम्ही ती वाचायचोच. पंरतू आता टि.व्ही. आणि समाजमाध्यमांमुळे पिढी भरकटत आहे. ह्या भरकटणाऱ्या पिढीला मुळपदावर आणण्यासाठी आणि उद्याची सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी बालकांच्या मनावर वाचन संस्कार आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील जय गणेश व्यासपीठ मंडळांच्या वतीने “चला मुलांनो, पुस्तक वाचू या” या उपक्रमाचे उद्घाटन
नूमवि प्राथमिक शाळा पटांगण येथे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अॅड.मिहिर प्रभुदेसाई, मुख्यध्यापिका विद्या सोनवणे आणि दिपा कुलकर्णी, संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, पराग ठाकूर, पियुश शहा, शिरिष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड काळात शाळा नाही, खेळ नाही, आॅनलाईन शिक्षण यातच लहान मुले अडकल्यामुळे त्या आभासी जगातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत ज्ञान आणि मनोरंजनात्मक जादूच्या गोष्टी, साहस कथा, शाैर्यकथा, राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांच्या गोष्टींबरोबरच अभ्यासपूरक प्रकल्पांसाठीची पुस्तकेही मुलांना घरोघरी जाऊन भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत.
पुणे शहरातील विविध भागातील गणपती मंडळांचे प्रतिनिधी यावेळी आवर्जून उपस्थित होते. 4 ते 14 वयोगटासाठींची पुस्तकांचे या गणपती मंडळामार्फत त्या त्या भागातील लहान मुलांना वाटप केले जाणार आहेत. घरपोच पुस्तके पोहचवली जाणार असून त्यानंतर त्या पुस्तकांची मुलांनी आपआपसांत देवाणघेवाण करायची, अशी सर्वसामान्यपणे या उपक्रमा मागची कल्पना आहे.
यावेळी बोलताना
राजीव बर्वे म्हणाले की, लोकमान्यांना गणेशमंडळांकडून ज्या प्रकारचे विधाकयक काम अपेक्षित होते, त्या वर्गवारीत मोडणारा आजचा उपक्रम आहे. लहान वयात मनाची पाटी कोरी असते. या कोऱ्या पाटीवरील संस्कार भविष्यात सहसा पुसेले जात नाहीत. म्हणूनच बालवयात मुलांवर वाचनाचे संस्कार होणे गरजेचे आहे. आज पुस्तकांचा प्रचार-प्रसार करावा लागत आहे, अशी दारुण अवस्था आहे. अशा परिस्थितीत सुदृढ, समंजस, समतोल आणि परिपक्व समाज कसा घडेल, हे पहायला हवे. वाचन संस्कृती रुजणे आणि ती फलद्रुप होणे हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे. गणपती मंडळाकडून घेण्यात आलेल्या पुढाकाराला आमचे पाठबळ म्हणून आमच्या प्रकाशनसंस्थेतर्फे देखील सवलतीत पुस्तके उपलब्ध करुन देऊ, असे अश्वासन देखील बर्वे यांनी यावेळी दिले.
मिहीर प्रभुदेसाई म्हणाले की, अमूक करु नका, असे मुलांना सांगणे सोपे आहे. पण मग काय करा हेही पालकांना सांगता आले पाहिजे. कुटुंबा कुटुंबा मधील संवाद हरवत चाललेला आहे. पुस्तक वाचनाचे आम्ही जेव्हा शैक्षणीक फुटपट्टी द्वारे परिक्षण करतो तेव्हा आम्हांस जाणवते की, पुस्तक वाचनामुळे बुद्धिचा देखील विकास होतो. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम किंवा घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्तिमत्वे घडण्यात पुस्तकांचा सिंहाचा वाटा असल्याचे खुद्द या दोन महान व्यक्तिंनीच जाहीररित्या अनेकदा सांगितलेले आहे. आजचा उपक्रम म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे.
पियुश शहा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वाचन चळवळीशी निगडीत असलेले प्रसाद भडसावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
